केज/प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे केंद्रीय संचार मंत्री मा. ज्योतिरादित्य शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन बीडजिल्ह्यातील टपाल विभागाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि सुलभ टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
यामध्ये पाटोदा,गेवराई व परळी वैजनाथ येथील जीर्ण विभागीय टपाल कार्यालयांच्या इमारतींची पुनर्बांधणी, केज उप टपाल कार्यालयासाठी कायम स्वरूपी विभागीय इमारतीचे बांधकाम, बीड विभागीय टपाल कार्यालयाचे बीड मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतर, अंबाजोगाई येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणे, मादळमोही शाखा टपाल कार्यालयाचे उप टपाल कार्यालयात उन्नतीकरण,आनंदगाव सारणी ता.केज येथे नवीन शाखा टपाल कार्यालयास मंजुरी तसेच बीडजिल्ह्यातील टपाल विभागाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे. आजच्या घडीला टपाल विभाग केवळ पत्रव्यवहारापुरता मर्यादित नसून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB),बचत योजना, डाक जीवन विमा,थेट लाभ हस्तांतरण (DBT),आधार आधारित सेवा आणि विविध आर्थिक व नागरिकाभिमुख सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील टपाल विभागाची पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.मा.केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यां मार्फत आवश्यक ती कार्यवाही करून प्रस्तावांवर प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ टपाल सेवा उपलब्ध व्हाव्यात,यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असे खा. बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे.













