मुंबई: आतापर्यंत विविध राजकीय पक्षांनी लोकशाहीची केवळ थट्टाच केली असून, स्वतःच्या कुटुंबांचे राजकीय अड्डे निर्माण केले आहेत. या घराणेशाहीमुळे देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य किसन चव्हाण यांनी केला आहे.
किसन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “ज्या वंचित समूहांचा राजकीय पक्षांनी आजवर केवळ मतदानापुरता वापर केला, त्यांना कधीही सत्तेत, पक्षात अथवा उमेदवारीत योग्य प्रतिनिधित्व आणि सन्मान दिला नाही. अशा दुर्लक्षित व नाकारलेल्या वंचित समूहांची भक्कम मोट बांधून त्यांना मान, सन्मान आणि सत्ताकेंद्रात प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठीच २०१९ मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘वंचित बहुजन आघाडी’ची स्थापना झाली.”
पक्षांतर्गत निवडणुकांद्वारे लोकशाहीचे आचरण
वंचित बहुजन आघाडीने केवळ वल्गना न करता वंचित घटकांना पक्षात मानाचे स्थान व उमेदवाऱ्या दिल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकांचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले की, “पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व सदस्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार वापरून राज्य समिती, प्रदेशाध्यक्ष आणि सदस्यांची निवड केली आहे. वंचित बहुजन आघाडी लोकशाही केवळ तोंडाने बोलत नाही, तर ती प्रत्यक्ष आचरणात आणते.”
इतर पक्षांना दिले आव्हान
देशात आणि राज्यात पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने संघटनात्मक निवडणुका घेणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष ठरला आहे. ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचा आदर्श घालून देत संघटनात्मक निवडणुका घेतल्या आहेत, त्याच धर्तीवर इतर सर्व राजकीय पक्षांनीही आपल्या पक्षात हिंमत दाखवून संघटनात्मक निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हानही किसन चव्हाण यांनी शेवटी दिले.












