केज/प्रतिनिधी
तालुक्याचा कणा मानल्या जाणाऱ्या केज तहसील कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गुरुवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी कार्यालयात एक ही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना मनस्ताप सहन करावा लागला.या गंभीर प्रकारा मुळे संताप व्यक्त होत असून,प्रशासकीय शिस्त नेमकी गेली कुठे?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नेमका प्रकार काय?
दि.२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काही नागरिक आणि लोकप्रतिनिधी आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात गेले होते. मात्र,संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.चौकशी केली असता खालील बाबी समोर आल्या :
तहसीलदार : शासकीय कामासाठी मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले.
नायब तहसीलदार: नायब तहसीलदार भंडारे हे देखील कार्यालयात अनुपस्थित होते,त्यांच्या अनुपस्थितीचे ठोस कारण कोणालाही सांगता आले नाही.
कर्मचारी वर्ग: अनेक टेबलवर कर्मचारी गायब होते.जे उपस्थित होते, त्यांच्याकडे कामाबाबत कोणतीही पुरेशी माहिती नव्हती.
सरकारी कार्यालयात तळीरामाचा राडा!
कार्यालयातील अनुपस्थितीचा कळस म्हणजे,सायंकाळी ५-३० वाजेपर्यंत वाट पाहूनही जेव्हा लोकप्रतिनिधी बाहेर पडले,तेव्हा तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर कचऱ्याच्या ढिगावर एक व्यक्ती दारूच्या नशेत झोपलेली आढळली.तहसील कार्यालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल,तर सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.वासुदेव नेहरकर यांचा आंदोलनाचा इशारा
या सर्व प्रकाराबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.वासुदेव नेहरकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्यांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांकडे फोनवरून तक्रार नोंदवली असून प्रशासनाला काही रोकठोक प्रश्न विचारले आहेत.
एकाच वेळी २० ते २५ कर्मचारी कार्यालयातून गायब कसे राहूशकतात?
गैरहजर कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज दिला होता काय? मुख्यालय सोडण्याची परवानगी घेतली होती का?
बायोमेट्रिक हजेरी आणि हजेरी पत्रकाची वरिष्ठ अधिकारी तपासणी करतात का?सामान्य जनतेची कामे खोळंबल्यास याला जबाबदार कोण?
जर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही,तर वरिष्ठ पातळीवर तक्रार करून जनआंदोलन उभारले जाईल,असा इशारा डॉ.वासुदेव नेहरकर यांनी दिला आहे.आता सर्वांचे लक्ष उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लागले असून,केज तहसीलचा गाडा पुन्हा रुळावर येणार का,हे पाहणे महत्वाचे ठरेल. 











