मराठवाड्या तील रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी,रेल्वेमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
नवी दिल्ली/प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदार संघासह संपूर्ण मराठवाडा विभागातील रखडलेले व अत्यावश्यक रेल्वे प्रकल्प पुर्ण करून घेण्यावर खा. बजरंग सोनवणे यांनी भर दिला आहे.रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम मार्गी लावण्यासाठी संसद भवन,नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे,संचार व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खा.बजरंग सोनवणे यांनी सविस्तर चर्चा केली.या बैठकीत मराठवाड्याच्या दळणवळण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
यावेळी मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गाचा मुद्दा बैठकीत अग्रक्रमाने मांडण्यात आला.मार्च २०२५ मध्ये या प्रकल्पाच्या सर्वेक्षणा साठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल रेल्वेमंत्री यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या प्रकल्पाचा डी पी आर तातडीने पूर्ण करून प्रशासकीय मान्यता देत प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, घाटनांदूर रेल्वे स्टेशन व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी पुन्हा मांडण्यात आली. यामध्ये औरंगाबाद-गुंटूर, बेंगळुरू-नांदेड,नांदेड – पनवेल या गाड्यांचा समावेश असून,कोविड पूर्वी असलेले थांबे पुन्हा सुरू करावेत,अशीमागणी ही करण्यात आली.यासर्व विषयांवर अश्विनी वैष्णव यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
००
इंटरसिटी सेवांबाबत चर्चा
विद्यार्थी,रुग्ण,व्यापारी तसेच नोकरदार वर्गाची वाढती गरज लक्षात घेता बीड-अहिल्यानगर-मुंबई व बीड-अहिल्यानगर-पुणे या मार्गांवर दररोज धावणाऱ्या इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू कराव्यात,अशी मागणी यावेळी करण्यात आली.या सेवांमुळे मराठवाड्याचा संपर्क थेट राज्याच्या प्रमुख शहरांशी मजबूत होणार असल्याचे सांगण्यात आले.या विषयावर सखोल चर्चा झाली.
बार्शी नाका येथे नवीन रेल्वे स्टेशनची मागणी
पूर्व बीड शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बार्शी नाका (बीड) परिसरात सुलभ ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याची गरज आहे,शिवाय नागरिकांची तशी मागणी देखील असल्याचे खा. सोनवणे यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.या रेल्वे स्थानकामुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होऊन बीड शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. रेल्वे मार्गावर ब्रिजची गरज. अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे गेटमुळे सतत वाहतूक कोंडी होत असून अपघातांचाही धोका वाढला आहे.हा धोका कमी करण्यासाठी संबंधित ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज व फूटओव्हर ब्रिज उभारण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडण्यात आली.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे महत्वाची आहे.तर बीड जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न पुर्ण करण्या साठी रेल्वे सुविधा वाढवण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.रेल्वेसाठी जे जे करावे लागेत,ते मी करेल आणि बीडचा रेल्वेचा प्रश्न सोडविण्या साठी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार आहे.
-खा.बजरंग सोनवणे, लोकसभा सदस्य,बीड.













