बीड | प्रतिनिधी
शहरातील भाजी मंडई परिसरात सोमवारी (दि. 23/02/2026) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा एक अनोळखी तरुण रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडलेला असल्याची माहिती जिव्हाळा परिवाराला फोनद्वारे मिळाली. “लवकर या, उपचार मिळाले नाहीत तर तो वाचणार नाही,” असा आर्त संदेश मिळताच जिव्हाळा परिवाराचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सदर तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. वेळ न दवडता शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्परता दाखवत पोलीस हवालदार गर्जे यांना घटनास्थळी पाठवले. उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्या तरुणाला रिक्षामधून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्या तरुणाची ओळख पटू शकली नसून त्याचे नाव, गाव किंवा नातेवाईकांची माहिती उपलब्ध नाही. रुग्णालयातील नोंदवहीत जिव्हाळा परिवाराच्या प्रतिनिधीचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवण्यात आला असून मृतदेह पोस्टमार्टम कक्षात ठेवण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाला कॅन्सरचा आजार होता. तोंडातील जीभ काढण्यात आल्याने त्याला बोलता येत नव्हते. तो भाजी मंडई परिसरात बिगारी काम करून उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपूर्वी तो ‘जिव्हाळा केंद्रात’ आश्रयास होता. प्रकृती खालावल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तो स्वतः घरी जाण्याची इच्छा व्यक्त करून गेला होता.
असे असतानाही शेवटच्या क्षणी त्याला रक्ताच्या नात्यांपैकी कुणाचाही आधार मिळाला नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. व्यसनाधीनतेमुळे कुटुंबीय दुरावल्याची चर्चा परिसरात होती. व्यसन माणसाला केवळ शारीरिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही एकाकी करते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेदरम्यान अनेकांनी केवळ चर्चा करत मदत न करता जबाबदारी इतरांवर ढकलल्याचे चित्रही पाहायला मिळाले. मात्र, जिव्हाळा परिवार व पोलिसांनी दाखवलेली मानवतेची भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सदर अनोळखी व्यक्तीस जिव्हाळा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मानवतेचा हात पुढे करणाऱ्यांमुळेच समाजात माणुसकी जिवंत आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले.













