पोलिस प्रशासन न्यूज.

“महा पशुधन एक्सपो” की महाखर्चाचा तमाशा? कोट्यवधींचा इव्हेंट, पण शेतकऱ्यांच्या हाती काय?


शेतकरी संतप्त : आम्हाला स्टॉल्स नकोत, गाई-म्हशी द्या!

 

तीन दिवसांच्या प्रदर्शनाने आत्महत्या थांबणार का? प्रशासनाला थेट सवाल.                      इव्हेंट मॅनेजमेंट की शेतकरी व्यवस्थापन? खर्चाचा हिशोब जाहीर करा! बालाजी जगतकर –      बीड:   बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या “महा पशुधन एक्सपो शिबिरा”वर आता तीव्र टीकेची झोड उठली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून भव्य स्टॉल्स, प्रात्यक्षिके आणि भाषणांचा सोहळा उभारला जात असताना, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार? हा थेट सवाल शेतकरी संघटनांकडून प्रशासनाला करण्यात येत आहे. दुष्काळ, पीकहानी आणि कर्जबाजारीपणामुळे होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. अशा परिस्थितीत तीन दिवसांच्या एक्सपोमधून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे का? की हा केवळ प्रसिद्धीचा आणि राजकीय शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम आहे? अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे —

> “आम्हाला घोडे-कुत्र्यांची प्रात्यक्षिके नकोत; गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैलजोडी थेट द्या. पशुखाद्य अनुदान द्या. कर्जमाफी करा. सातबारा कोरा करा. तेव्हाच खरे पशुसंवर्धन!”

सत्ताधारी आणि संबंधित विभागीय मंत्र्यांनी केवळ भव्यतेचा आव आणू नये, तर निधीचा किती भाग थेट लाभार्थ्यांना दिला जाणार आहे, याचा स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासनाला थेट प्रश्न

एक्सपोसाठी मंजूर निधी किती?

त्यातील थेट अनुदान किती?

लाभार्थी निवड प्रक्रिया काय? शिबिरानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ मोजण्यासाठी कोणती ठोस योजना? शेतकरी संघटनांचा इशारा स्पष्ट आहे – “जर हा कार्यक्रम केवळ दिखाव्यापुरता असेल आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल.”आज गरज आहे ती मोठ्या मंचांची नाही, तर मोठ्या निर्णयांची.

“महा पशुधन एक्सपो” खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचा असेल, तर तो स्टेजवर नव्हे तर शेतकऱ्यांच्या गोठ्यात दिसला पाहिजे — अन्यथा हा महाखर्चाचा तमाशा ठरेल, अशी संतप्त भावना जिल्ह्यात उमटत आहे.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!