लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज नेटवर्क
मुंबई / बीड:
बीड जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यातील अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या बैठकीत रेल्वे प्रकल्प, दुष्काळ निवारण, शेती प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीतील महत्त्वाच्या मागण्या आणि घडामोडी:
धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्ग:
या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के खर्चाचा वाटा उचलावा, या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. यावर शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून कामाला गती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
कृष्णा नदीचे अतिरिक्त पूरपाणी मराठवाड्याला:
सांगली–कोल्हापूर परिसरातील कृष्णा नदीचे अतिरिक्त पूरपाणी उजनी धरणात आणून, तेथून ते मांजरा धरणात वळवण्याबाबत आवश्यक तांत्रिक उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प झाल्यास मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात तातडीने चारा छावण्या सुरू करा:
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि चाऱ्याची टंचाई लक्षात घेऊन पशुपालक व शेतकऱ्यांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची आग्रही मागणी खासदारांनी केली.
शेतकरी प्रश्न व सौर कृषी पंप:
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासोबतच सौर कृषी पंप योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्याबाबत चर्चा झाली.
CRIF अंतर्गत प्रत्येक तालुक्याला निधी:
सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (CRIF) अंतर्गत बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक महत्त्वाचा रस्ता किंवा पायाभूत सुविधांचे काम खासदारांच्या शिफारशीनुसार मंजूर करावे, अशी मागणी मांडली.
महाराष्ट्र ‘दिशा’ समितीची विशेष बैठक:
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हानिहाय विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व खासदार व मंत्र्यांची दिशा समितीची विशेष बैठक तातडीने आयोजित करावी, अशी सूचना करण्यात आली.
”बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील जनतेच्या हक्काच्या विकासासाठी हे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणले असून, या मागण्या पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.”
— खा. बजरंग सोनवणे











