बीड (गेवराई):
गेवराई तालुक्यातील गुळज परिसरात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या माफियांनी धुमाकूळ घातला असून, एका किरकोळ कारणावरून दोन बौद्ध तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात रमेश निकाळजे आणि परमेश्वर गवारे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, निकाळजे यांना तब्बल ४५ टाके पडले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश निकाळजे यांच्या घरासमोरून वाळूने भरलेले डंपर अतिशय वेगाने जात होते. परिसरात लहान मुले खेळत असल्याने ‘वाहने सावकाश चालवा’, अशी विनंती निकाळजे यांनी डंपर चालकाला केली होती. मात्र, ही साधी विनंती वाळू माफियांच्या जिव्हारी लागली. याचाच राग मनात धरून आरोपींनी तलवार, कुकरी आणि इतर धारदार शस्त्रांनी रमेश निकाळजे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेले परमेश्वर गवारे यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली.
पोलिसांची सुरुवातीला टाळाटाळ
हल्ल्यानंतर जखमींनी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने आणि ते सत्ताधारी भाजपशी संबंधित असल्याने पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. “सत्तेतील पक्षाचे नाव वापरून वाळू माफिया परिसरात दहशत माजवत आहेत,” अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.
सुजात आंबेडकरांची आक्रमक भूमिका
या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार वंचितचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. पक्षाचा आक्रमक पवित्रा आणि पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांनी नमते घेत याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
पदाधिकाऱ्यांची पीडितांशी भेट
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, डॉ. दिनेश सुरडकर, अॅड. गौतम साळवे, मिलिंद सरपते, रोहन मगर आणि धम्मा धूळधुळे यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
प्रशासनासमोर आव्हान:
या घटनेमुळे गेवराई परिसरात तणावाचे वातावरण असून, अवैध वाळू उपसा आणि त्यातून निर्माण झालेली ही गुंडगिरी मोडून काढण्याचे मोठे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.














