भूसंपादन आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश; जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आढावा बैठक
केज/प्रतिनिधी:
अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आणण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “या वर्षात रेल्वे परळीपर्यंत हायस्पीड धावलीच पाहिजे, यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी दि. २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित रेल्वे विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वेचे मुख्य अभियंता लोळगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी खासदारांनी बीड ते परळी दरम्यानच्या प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला.
भूसंपादन आणि तांत्रिक चुकांवर ओढले ताशेरे
बीड ते परळी दरम्यान अद्याप २० ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करा आणि जे कंत्राटदार कामात दिरंगाई करत आहेत, त्यांना कडक समज द्या, असे आदेश सोनवणे यांनी दिले. शिरूर येथे रेल्वे पटरीखाली तिरका पूल बांधल्याने वस्तीचा रस्ता बंद झाल्याचा प्रकार समोर आला, त्यावर “अभियंते काम कसे करतात? सरकारचा निधी विनाकारण खर्च करू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष
रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे हिवरसिंगा, शिरापूर धुमाळ आणि बरगवाडी भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच, रायमोह रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता खोदून ठेवल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली की, “हा विषय पुन्हा सांगायला लावू नका.”
महत्त्वाच्या मागण्या आणि नवे प्रकल्प
मालधक्का: आष्टी येथील मालधक्का तातडीने कार्यान्वित करा, तसेच बीड आणि परळीतही मालधक्के उभारण्याच्या सूचना.
नव्या रेल्वे: बीड-नगर-मुंबई आणि बीड-नगर-पुणे या मार्गावर ‘इंटरसिटी’ सेवा सुरू करण्याची मागणी.
परळी-परभणी दुहेरीकरण: घरांचे नुकसान टाळून थर्मल परिसरातील मोकळी जागा वापरण्याचा पर्याय सुचवला.
नवीन मार्ग: धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
”रेल्वे हा बीडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा. कामाचा वेग वाढवण्यासाठी गरज पडल्यास रात्रंदिवस काम सुरू ठेवा.”
— खा. बजरंग सोनवणे











