केज:लाईव्ह अशोका टाईम्स. प्रतिनिधी:
साळेगाव (ता. केज) येथील वडिलोपार्जित स्मशानभूमीची जागा नावावर करून तिथे संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन देऊन दोन वर्षे उलटली, तरी अद्याप ग्रामपंचायतीने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे बहुजन विकास मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रोहन बचूटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रश्न तातडीने न सुटल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी साळेगाव येथील स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी मा. खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मध्यस्थी केली होती. ग्रामपंचायत प्रशासनाने “स्मशानभूमीची जागा नावावर करून तिथे मजबूत कंपाउंड वॉल बांधून देऊ” असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले होते.
प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची बोळवण?
उपोषणानंतर स्मशानभूमीची शासकीय मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, मोजणी होऊन बराच काळ लोटला तरी अद्याप ही जागा नावावर झालेली नाही. प्रशासनाकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप रोहन बचूटे यांनी केला आहे. ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, “आम्ही दिलेल्या शब्दाचा मान राखून उपोषण मागे घेतले, पण प्रशासनाने आमचा विश्वासघात केला आहे.”
जीवितास धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार
येत्या काही दिवसांत हा प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार बचूटे यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनादरम्यान कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन साळेगाव जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनामुळे साळेगाव परिसरात पुन्हा एकदा स्मशानभूमीचा प्रश्न चर्चेत आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













