केज|लाईव्ह अशोका टाईम्स. प्रतिनिधी:
देशसेवेचे व्रत आयुष्यभर जोपासणाऱ्या वीर सैनिकांचा सन्मान करणे, हीच काळाची गरज असून तोच खरा राष्ट्रवाद आहे. साबला (ता. केज) येथे कै. अश्रुबा चंद्रभान काकडे (माजी सैनिक) यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित सोहळ्यातून हाच सामाजिक कृतज्ञतेचा आदर्श पाहायला मिळाला.
आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांची फटकेबाजी
या निमित्ताने आयोजित ‘प्रेरणादायी व्याख्यान’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध आदर्श सरपंच मा. भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि शिस्त या त्रिसूत्रीवर त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले. “गावाचा विकास करायचा असेल तर केवळ रस्ते आणि नाल्या महत्त्वाच्या नाहीत, तर माणसांच्या विचारांचा विकास होणे गरजेचे आहे,” असे विचार त्यांनी मांडले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास शेकापचे भाई मोहन गुंड व सभापती विष्णू (भाऊ) घुले यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांनी मा. पेरे पाटील यांचे विचार आत्मसात करत, माजी सैनिकांप्रती गौरव उद्गार काढले. कै. अश्रुबा काकडे यांच्या स्मृतींना उजाळा देत असतानाच, परिसरातील आजी-माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले, ज्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
पंचक्रोशीतून मोठा प्रतिसाद
या सोहळ्यासाठी साबला गावासह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला मंडळाची विक्रमी उपस्थिती होती. “देशसेवेचा आदर्श जपणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान हीच कै. काकडे यांना खरी श्रद्धांजली आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काकडे परिवार आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि विचारांची मेजवानी यामुळे या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण केज तालुक्यात होत आहे.













