बीड | प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील पत्रकारांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थांसाठी राज्य शासनाने ₹५ कोटींचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी लघु व मध्यम वृत्तपत्र संघटनेचे जिल्हा सचिव बालाजी श्रावण जगतकर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुमित्राताई अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, संपादक तथा भारतीय लघु व मध्यम पत्रकार संघटणा जिल्हा सचिव बालाजी जगतकर , कामगार नेते गौतम आगळे आदीचे शिष्टमंडळ भेटले.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाज, शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत. दिवस-रात्र जनहितासाठी कार्य करणाऱ्या अनेक पत्रकारांना आजही स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे परळी वैजनाथ आणि बीड येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्था सक्षमपणे उभारण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ पत्रकार गृहनिर्माण संस्था आणि बीड पत्रकार गृहनिर्माण संस्था यांना प्रत्येकी ₹५ कोटींचा विशेष निधी मंजूर करून पत्रकारांच्या दीर्घकालीन आणि न्याय्य मागणीला न्याय द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
पत्रकार कल्याणाला प्राधान्य देत या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही बालाजी श्रावण जगतकर यांनी व्यक्त केली आहे.












