परळी प्रतिनिधी:=नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने त्वरित अमलात आणावा आणि नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना पंचनाम्यांची वाट न पाहता तातडीने ₹ १५,००० आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य एल्गार महा सभेत बोलत होते. अकोला पॅटर्न आणि तात्काळ मदतीची मागणी
युवा नेते सुजातदादा आंबेडकर पुढे म्हणाले की, सध्या सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पूरग्रस्तांसाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात प्रथम तातडीने आर्थिक मदत दिली होती आणि त्यानंतर पंचनामे झाल्यावर शासनाची मदत दिली गेली. त्याच धर्तीवर, सध्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदर ₹ १५,००० जमा करावेत आणि त्यानंतर पंचनामे झाल्यानंतर देण्यात येणारी मदत द्यावी.बँका आणि सावकारांना इशाराअशा कठीण परिस्थितीत बँका, पतसंस्था आणि खासगी सावकारांनी माणुसकी दाखवण्याची गरज आहे, अन्यथा आमचे कार्यकर्ते माणुसकी विसरतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.मुख्यमंत्री व मंत्र्यांवर खोचक टीकाजनतेचे पैसे जनतेवरच खर्च झाले पाहिजेत. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी स्वतःच्या फोटोवर खर्च करू नये, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.सभेतील प्रमुख उपस्थिती आणि पक्षप्रवेशवंचित बहुजन आघाडी परळी तालुक्याच्या वतीने शहरातील श्रद्धा मंगल कार्यालयात ही भव्य एल्गार सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते, तर राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण सर, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद सर आदी मान्यवर उपस्थित होते. याच सभेत मुस्लिम समाजाचे युवा नेते शेख शाकेर अहमद, बंजारा समाज युवा नेते विकास पवार, आणि वंजारी समाजाचे रवी मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश केला.या सभेला बीड येथून सुजातदादा आंबेडकर यांना येण्यास उशीर झाला तरीही हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष उपस्थित होते. यामुळे परळी शहरात वातावरण वंचितमय झाल्याचे दिसून येत होते.













