केज/प्रतिनिधी
केज शहरातील कानडी रोड परिसरातील क्रांतीनगर,विठ्ठल नगर वार्ड क्रमांक १ येथील नागरिकांनी बाबुराव गालफाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरीसुविधांच्या मागण्यांसाठी आता आक्रमक भूमिका घेतली असून,दि. १५ मे २०२६ रोजी विठ्ठल मंदिर परिसरात चक्री उपोषण करण्यात आहे आहे. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी यांना तसेच बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार,१९८३ – ८४ दरम्यान शासनाने निराधार,भूमिहीन,बेघर तसेच अनुसूचित जाती- जमाती,भटक्या-विमुक्त, अल्पसंख्याक घटकातील कुटुंबांना क्रांतीनगर परिसरात प्रत्येकी एक गुंठा जागा व पत्र्याचे घरकुल बांधून मालकी हक्काने वाटप केले होते. मात्र,कालांतरानेअतिवृष्टी,अशिक्षितपणा,अज्ञाना मुळे अनेकांचे कागदपत्रे हरवली.गेल्या चाळीस वर्षांत लोकसंख्या वाढल्याने परिसरातील घरांची संख्या पाचशे ते सहाशेपर्यंत पोहोचली आहे.त्यामुळे नागरिकांनी शासनाने वाढीव जागा देऊन नियमित मालकी हक्काचे कागद द्यावेत तसेच सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
क्रांतीनगर परिसरातील विठ्ठल मंदिर,महात्माफुले सभागृह,अण्णाभाऊसाठे सभागृह,अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागांची अधिकृत मोजणी करून नगर पंचायत अभिलेखात नोंद घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय यशकन्स्ट्रक्शन कंपनीने अपूर्ण ठेवलेल्या नाला पुलाच्या रुंदीकरणा चे काम तात्काळ पूर्ण करावे,जुने रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करावी, बंद पडलेले बोअरवेल व सबमर्सिबल पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले हप्ते तातडीने वितरित करावेत,सर्वे क्रमांक १०० मधील गायरान जमिनीत शेतरस्ता खुला करावा तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांमधील केवायसी अडचणी दूर करून बंद पडलेली मानधने पुन्हा सुरू करावीत,अशीही मागणी करण्यात आली आहे.जुने महात्मा फुले सभागृह जिल्हा नियोजन समिती अथवा आमदार -खासदार निधीतून दुरुस्त करावे,अशी मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
चार वर्षांत २२ निवेदने; तरीही प्रश्न कायमच
नागरिकांच्या म्हणण्या नुसार,२०२२ ते २०२६ या कालावधीत विविध प्रश्नांसंदर्भात आंदोलने व तब्बल २२ निवेदने प्रशासनाला देण्यात आली.मात्र अद्याप कोणतीही ठोसकार्यवाही झालेली नसल्याचे यावेळी बोलताना बाबुराव गालफाडे सर म्हणाले.त्यामुळे अखेर नागरिकांनी लोक प्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्री उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
या आंदोलनात बाबुराव गालफाडे,इरफानपठाण, अनिल लोखंडे,अजय गालफाडे,भिमराव मस्के, अमोल मस्के,इमरान तांबोळी,अमन पठाण, सिताराम वैरागे यांच्या सह परिसरातील नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती आमदार नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी बीड, उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई,तहसीलदार केज,नगर पंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.














