संभाजीनगर (औरंगाबाद): वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात आज औरंगाबाद शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, तरुणांपासून वृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले.सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत तणाव आणि घोषणाबाजी: या ‘जन आक्रोश मोर्चात’ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. हा मोर्चा शहरातील आरएसएसच्या कार्यालयाकडे (बाबा पेट्रोल पंप जवळ) जात असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून गर्दीला कार्यालयाकडे जाण्यापासून अडवले. या अडवणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिस आमनेसामने आले. उपस्थितांनी यावेळी हातात फलक घेऊन ‘भारतीय संविधान जिंदाबाद’ आणि ‘RSS मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
RSS कडून संविधान, तिरंगा स्वीकारण्यास नकार; DCP नी.स्वीकारले:मोर्चादरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी थेट आरएसएसच्या कार्यालयात काही महत्त्वाचे दस्तावेज सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र, RSS ने भारताचे संविधान, तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला.त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी हे दस्तावेज थेट उपायुक्त (DCP) यांच्याकडे सुपूर्द केले, आणि डीसीपींनी ते स्वीकारले.युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला.राज्य समिती सदस्य अमित भुईगल यांनी भारताचे संविधान दिले. राज्य समिती सदस्य शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत दिली. याशिवाय, मोर्चादरम्यान युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी उपस्थितांना शपथ दिली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात
आला होता.













