केज,लाईव्ह अशोका टाईम्स(प्रतिनिधी) :
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. एकीकडे खून, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त असताना, आता सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ‘आवादा’ (Avaada) कंपनीने विकासकामांच्या नावाखाली दलित शेतकऱ्यांवर अन्याय सुरू केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
बळजबरीने काम आणि धमक्यांचा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या नावाखाली वीजनिर्मितीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीकडून केज तालुक्यात ‘गुंडशाही’ला खतपाणी घातले जात आहे. विशेषतः कानडी माळी परिसरात पवनचक्कीसाठी पोल आणि तारांचे कनेक्शन टाकताना कायद्याची सरळ-सरळ पायमल्ली केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही वीज लाईन जात आहे, त्यांना योग्य मोबदला देणे बंधनकारक असताना, गुंडांच्या मदतीने त्यांना धमकावून बळजबरीने काम केले जात आहे.
शेतकरी सुखदेव मस्के यांची व्यथा
या अन्यायाचा बळी सुखदेव नागु मस्के हे दलित शेतकरी ठरले आहेत. त्यांच्या शेतजमिनीत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वाघमारे नावाच्या व्यक्तीमार्फत त्यांना धमक्या देण्यात आल्या. “दिलेला मोबदला घ्या, नाहीतर परिणाम भोगा,” असा उघड इशारा त्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे सध्या संपूर्ण दलित कुटुंब दहशतीखाली वावरत आहे.
प्रशासनाची उदासीनता
या गंभीर प्रकरणी सुखदेव मस्के यांनी २३ डिसेंबर रोजी केज तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, एक महिना उलटूनही अद्याप एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन साधी चौकशीही केलेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे, “प्रशासन दलित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जाणीवपूर्वक उदासीन आहे का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
आंदोलनाचा इशारा
या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये तीव्र संताप असून, “कायदा फक्त गरिबांसाठीच आहे का?” असा प्रश्न विचारला जात आहे. जर प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आवादा कंपनीवर कारवाई केली नाही आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला नाही, तर दलित संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.













