बीड:
महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे, प्रशासनावर भक्कम पकड असणारे आणि पहाटे ५ वाजल्यापासून कामाचा झंझावात सुरू करणारे कणखर नेतृत्व म्हणजे अजित दादा. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र एका धुरंधर नेत्याला मुकला आहे. दादांच्या जाण्याने पाटील कुटुंबाने एक जवळचा स्नेही गमावला असून, त्यांच्याविना आता महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण बेचव वाटेल, अशा शब्दांत राज्यसभा खासदार सौ. रजनी पाटील यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
कौटुंबिक स्नेह आणि ४ दशकांचा प्रवास
अजित पवार आणि पाटील कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. चार दशकांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या दादांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. योग्य नियोजन आणि कामाच्या बाबतीत कमालीची कठोरता ही त्यांची वैशिष्ट्ये राज्याला नेहमीच आठवत राहतील.
बीड जिल्ह्याचे नुकसान
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी जिल्ह्याला एक नवी कार्यसंस्कृती दिली होती. पहाटे ६ वाजता होणारी उद्घाटने आणि शासकीय रुग्णालयांना दिलेल्या अचानक भेटी यांमुळे प्रशासनात एक जरब निर्माण झाली होती. बीडच्या विकासासाठी दादा नेहमीच सकारात्मक असायचे, अशी आठवण रजनी पाटील यांनी यावेळी करून दिली.
”जनतेला आणि कामाला प्राधान्य देणारा, स्पष्ट बोलणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा लोकनेता गेला, ही उणीव राज्याला कायम जाणवत राहील,” अशा शब्दांत त्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.














