मालेगाव:लाईव्ह अशोका टाईम्स (प्रतिनिधी): मतदान हा मतदारांचा मूलभूत अधिकार असून तो कोणत्याही दबावाशिवाय किंवा प्रलोभनाशिवाय बजावला पाहिजे. निवडणुकीच्या काळात पैशाचे वाटप, दारू, मटण यांसारखी प्रलोभने दाखवली जातात, परंतु अशा अमिशांना बळी पडणे म्हणजे स्वतःच्या शहराचे भविष्य विकण्यासारखे आहे,” असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंचशील नगर (कॅम्प) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
सरकारवर आणि प्रस्थापित पक्षांवर टीका
राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की, राज्य सरकारने गेल्या सात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक रोखून धरल्या आहेत. प्रस्थापित पक्ष आणि मनुवादी विचारसरणीचे प्रतिनिधी पुन्हा सत्तेत आले, तर भविष्यात लोकशाही निवडणूक पद्धतीवरच गदा येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शिवसेना आणि भाजपाला पराभूत करणे ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुस्लिम नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अॅड. आंबेडकर यांनी मुस्लिम समाजातील राजकीय नेतृत्वावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “अनेक नेते जात-धर्माच्या नावाने मते मागतात, मात्र जेव्हा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्याची वेळ येते, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हे प्रतिनिधी गप्प बसतात.” केवळ धर्म न पाहता शहराचा विकास करू शकणाऱ्या सक्षम उमेदवारालाच निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.













