गेवराई (प्रतिनिधी): गेल्या चार-पाच दिवसांपासून गेवराई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्या व नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने शासनाला तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. गेवराई तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
सरसकट आर्थिक मदत: सरकारने पंचनामे करण्याऐवजी, प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट प्रति हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई द्यावी.
तातडीने कर्जमाफी: या संकटात सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करावे.
इतरांनाही मदत: शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, गायरानधारक आणि सिलिंगधारकांनाही तात्काळ अनुदान देण्यात यावे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत: पुरामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले किंवा वाहून गेले, त्यांना पुन्हा शालेय साहित्य पुरवावे आणि त्यांची परीक्षा फी माफ करावी.
दिवाळीपूर्वी मदत: ही सर्व नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी दिली जावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल.
हे निवेदन सादर करताना गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड, बीड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्यासह किशोर भोले, किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर हवाले, कृष्णा हातागळे, सुनील चव्हाण, धुराजी राठोड आणि इतर शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













