सुखपुरी/लखमापूर, (रामकिसन अवधूत): अंबड तालुक्यातील सुखापुरी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असून ते अपूर्ण अवस्थेत रखडल्यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऊस वाहतूक सुरू असताना तर येथील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.सहा महिन्यांपासून काम ठप्प: गेल्या सहा महिन्यांपासून पुलाचे काम सुरू आहे, परंतु ते पूर्णपणे ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यापासून हवामान खुले होऊनही ठेकेदाराने अद्याप काम पुन्हा सुरू केलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
नागरिकांचा संपर्क तुटला:
काम का थांबले, याची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद येत आहे. तसेच, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे फोनदेखील रिचेबल नसून त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाहीये. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांची समस्या सोडवायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऊस वाहतुकीला मोठा अडथळा:
सध्या साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऊसाचे वाहन चालवताना, विशेषतः दोन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी सोबत ठेवून ऊस वाहतूक करावी लागत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मोठा पूल ओलांडताना वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना कसरत करावी लागतेय:
सध्या पुलावरील कडे (कठडे) बसवायचे बाकी आहेत आणि दोन्ही बाजूंनी मुरूम टाकून भराव करण्याची गरज आहे. अपूर्ण पुलामुळे लखमापूर आणि सुखापुरी गावातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
आंदोलनाचा इशारा:
स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर शासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष दिले नाही आणि काम सुरू केले नाही, तर दोन्ही गावांतील नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.













