केज/येवता (प्रतिनिधी):
तालुक्यातील मौजे येवता येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना नियमबाह्य आणि चुकीची असल्याचा आरोप करत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे तालुकाध्यक्ष मा. दीपकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केजचे माननीय तहसीलदार श्री. राकेश गिड्डे यांना निवेदन देण्यात आले. या प्रभाग रचनेत तातडीने सुधारणा न झाल्यास येत्या १२ मार्चपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपाई आय टी सेल ता.अध्यक्ष सुरज काळे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
१ मार्च २०२६ रोजी हनुमान मंदिर येथे झालेल्या बैठकीत प्रभाग रचनेबाबत चर्चा झाली होती. मात्र, ६ मार्च रोजी संबंधित महसूल आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक गावात बैठक घेऊन प्रभाग रचनेची प्रक्रिया राबवली. यामध्ये दलित समाजातील प्रतिनिधी आणि मतदारांना पूर्णपणे डावलून लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम प्रशासनाने केल्याचा आरोप दीपकभाऊ कांबळे यांनी यावेळी केला.
राजकीय दबावाखाली कार्यवाही?
निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, प्रभाग १ व २ मध्ये कोणताही बदल न करता केवळ प्रभाग ३ व ४ मध्ये सोयीनुसार बदल करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थितीची पाहणी न करता स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली आणि आर्थिक हेतूने ही प्रभाग रचना केल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. ही रचना निवडणूक नियमांच्या विरोधात असून यामुळे दलित समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
१२ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा
तहसीलदार श्री. राकेश गिड्डे यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर या चुकीच्या प्रभाग रचनेचा तातडीने फेरविचार झाला नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि मौजे येवता येथील समस्त दलित समाज व ग्रामस्थांच्या वतीने १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष मा. दीपकभाऊ कांबळे यांच्यासह रिपाई आयटी सेल ता.अध्यक्ष सुरज दत्तात्रय काळे, विनोद उत्तम गायकवाड, हरीश शहाजी गायकवाड, राहुल सुंदर काळे व बहुसंख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.











